IND vs SA 2nd Test :भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa Test) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळली जाईल, तर दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी (Guwahati) येथे रंगणार आहे. या दुसऱ्या कसोटीत एक अनोखा बदल पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे लंचपूर्वी टी ब्रेक (Tea break before lunch Interval) घेतला जाणार आहे. भारतात कसोटी सामन्यांमध्ये असा बदल प्रथमच होणार आहे. टॉस, लंच, चहा, स्टंप (दिवसाचा खेळ संपला)… कसोटी सामन्यांमध्ये हा नेहमीचा क्रम आहे, परंतु 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा क्रम बदलणार आहे.
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, पहिल्यांदाच खेळाडूंना लंचच्या आधीच टी ब्रेक मिळेल. देशाच्या पूर्व भागात सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होता, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये खेळाचा पहिला सत्र सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर 11 ते 11:20वाजेपर्यंत टी ब्रेक दिला जाईल. दुसरे सत्र 11:20ते दुपारी 1:20या वेळेत खेळले जाईल, आणि मग 1:20ते 2 वाजेपर्यंत लंच ब्रेक असेल.
अखेरचं सत्र दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पार पडेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांच्या मते, “गुवाहाटीत सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे सामना सकाळीच लवकर सुरू करावा लागतो. खेळाचा वेळ वाढवण्यासाठी लंचपूर्वी टी ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रयोग प्रथमच केला जात आहे. ” अशा प्रकारे या सामन्याचा खेळ सकाळी 9 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 4 वाजता संपेल.
रणजी ट्रॉफीत आधीच झालेला प्रयोग सामान्यतः भारतातील कसोटी सामने सकाळी 9:30वाजता सुरू होतात. 40 मिनिटांचा लंच ब्रेक (11:30ते 12:10)आणि 20 मिनिटांचा टी ब्रेक (2:10ते 2:30)असा असतो. तिसरे सत्र 2:30ते 4:30 चालते. दिवसाला 90 षटकं पूर्ण करण्यासाठी अर्धा तास अतिरिक्त वेळ दिला जाऊ शकतो. याआधीही बीसीसीआयने रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये सूर्यास्ताच्या वेळेनुसार सत्रांचे वेळापत्रक बदलले आहे, आणि आता तोच प्रयोग आंतरराष्ट्रीय कसोटीत पहिल्यांदाच होणार आहे.








