मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाचे पहिले पंतप्रधान आणि दिवंगत नेते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या राजकीय कारकिर्दीवरुन टीका होत असते. नेहरुंच्या भूमिकेवरुन त्यांच्याकडून काँग्रेसला लक्ष्य केलं जातं. आता, मुख्यमंत्री यांनीही कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करत पंडित नेहरुंच्या इतिहासाची आठवण करुन दिली. शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सेंट मेरी स्टेशन करणे याचा मी निषेध करतो, एकप्रकारे छत्रपती अपमान करण्याचं काम कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने केलंय. या गोष्टीचं मला दु:ख आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या नामांतवरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी स्टेशन करण्याचा मी निषेध करतो. कर्नाटक सरकार शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे. पण, शिवाजी महाराजांना अपमानित करण्याची परंपरा ही काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरु हे पंतप्रधान असण्यापासून आहे, असा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला. तसेच, डिसकव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरुंनी लिहिलं होतं, त्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे जे मत व्यक्त केलं होत, हे आपल्याला माहिती आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये सातत्याने तीच परंपर दिसत आहे. ईश्वराने काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी. धार्मिक विरोधी व्यवस्था उभी करत ते तेढ निर्माण करणार नाहीत ही माझी अपेक्षा आहे, असेही फडणवीसांनी म्हटले. दरम्यान, कर्नाटक सरकारने बंगळुरुतील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नामांतर करुन सेंट मेरी करण्याची शिफारस केली आहे. त्यावरुन, आता वाद निर्माण झाला असून भाजपकडून हा हिंदूचा अवमान असल्याचे म्हटले जात आहे.
हा जीआर सरसकट आरक्षण देत नाही
मराठा आरक्षण व हैदराबाद गॅझेटियरच्या विरोधात ओबीसी नेत्यांकडून याचिका करण्यात आली आहे. त्यावर, बोलताना फडणवीस म्हणाले की, याचिका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आम्ही विचार करुन जीआर काढला आहे, कोणालाही सरसकट आरक्षण हा जीआर देत नाही. पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच हा जीआर मदत करतो. मी ओबीसी समाजातील नेत्यांना सांगू इच्छितो कोणालाही सरसकट आरक्षण दिलेलं नाही, पुरावा तपासूनच आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर, ओबीसींच्या मोर्चावर बोलताना, राजकीयदृष्टीने कोणाला काम करायचं असेल तर थांबवू शकत नाही. मात्र, जोपर्यंत आमचं सरकार आहे, आम्ही ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
नेपाळ देशातील अराजकतेवरुन विरोधकांची टीका
नेपाळमधील अराजकतेवरुन विरोधकांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय. अलिकडच्या काळात जो विरोधी पक्ष आहे, त्यांनी विरोधाची अशी पातळी गाठली आहे. ते आता देशविरोधी, व्यक्तीविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. विरोधी पक्षाने भूमिका घ्यायची असते, त्यांनी पॉलिसी, योजनांचा विरोध करावा. मात्र, देशाचा विरोध त्यांनी करु नये, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.